वाशिम : वंचितने राज्यात अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु आता वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अभिजित राठोड यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.
राज्यातील लोकसभेच्या ८ जागांसाठी दुस-या टप्प्यात मतदान होणार आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांनी ४७७ अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिल रोजी समाप्त झाली. आज ५ एप्रिल रोजी त्या अर्जांची छाननी झाली. त्यात यवतमाळ मतदारसंघातून वंचित आघाडीला धक्का बसला आहे. अभिजित राठोड यांचा अर्ज बाद झाला आहे.
सर्वाधिक अर्ज नांदेडमधून
राज्यात दुस-या टप्प्यात सर्वाधिक अर्ज नांदेडमधून दाखल झाले आहेत. नांदेडमध्ये ७४ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे वर्ध्यात सर्वांत कमी २७ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. आता ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या आठ जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे.