मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने व्यथित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डायण मंत्र्यांना पत्र पाठवून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पत्राला केंद्रीय नागरी उड्डायणमंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर पाठवले असून, या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डायणमंत्री नायडू यांना पत्र पाठवून, अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात आणखी ४ जणांना मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. भविष्यात असे अपघात घडणार नाहीत या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती. यावर नायडू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांनी तपास सुरू केला आहे.
विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू आहे.तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील स्थिती याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन उड्डायण मंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मोलाचे असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

