शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे. साई चरणी भक्तांकडून नेहमीच दान-धर्म केला जातो. आता याच दानामुळे साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा झाले असून यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे आता सोने कुठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होतो.
साई संस्थानच्या तिजोरीत पाचशे किलो सोने जमा झाले आहे. यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही वर्षात दुपटीने वाढ झाली आहे, त्यामुळे साई संस्थानच्या संपत्तीत तब्बल अडीचशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता साई संस्थानकडे हे सोने साठवायला जागा कमी पडत आहे. स्टेट बँकेकडे सोने ठेवायला दिले, तर त्यावर अडीच टक्के व्याज मिळू शकते. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती जर अशीच राहिली तर साई संस्थानला देणगी स्वरूपात येणारे सोने साठवण्यासाठी विस्तारीत जागा तयार करावी लागेल.
या पाचशे किलो सोन्याच्या साठ्यात शंभर किलो वजनाचे साई सिंहासन समाविष्ट आहे. याशिवाय, सुबक आणि मौल्यवान दागिन्यांचाही समावेश असून हे दागिने सुरक्षित ठेवावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सुमारे अडीचशे किलो सोने वितळवण्या योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सुमारे १४० किलो वजनाच्या वस्तू वितळवून त्यापासून सुवर्ण नाणी तयार करण्याचा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला होता, ज्याला उच्च न्यायालयाचीही मान्यता मिळाली होती. मात्र, या निर्णयाला श्रीरामपूर येथील ऍड. संदीप कुलकर्णी यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.
ऍड. संदीप कुलकर्णी यांच्या निरीक्षणानुसार, साई संस्थानने आजवर तीन वेळा आपल्याकडील सोन्याच्या वस्तू वितळवून सुवर्ण नाणी तयार केली आहेत. ही नाणी अडीच, पाच, दहा आणि वीस ग्रॅम वजनाची असून एकूण सुमारे सदतीस किलो वजनाचे सोने या स्वरूपात वितरित करण्यात आले. त्यापैकी सुमारे पाच किलो वजनाची नाणी अद्याप शिल्लक आहेत. दरवर्षी केवळ दोन ते तीन किलो सोन्याच्या नाण्यांचीच विक्री होते. हे लक्षात घेता, नव्याने तयार करण्यात येणा-या नाण्यांची विक्री होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यासंबंधित जोखीमही वाढू शकते.