पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे समाजमन हादरून गेले असून याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत लग्नकार्यांमध्ये चालू असलेल्या अनिष्ट चालीरीतींना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येत एक बैठक घेतली. आणि या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिरोळे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, वैष्णवीसारख्या मुलींना भोगावा लागणारा छळ थांबवण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित लोकांची एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती लग्नांमधील अनावश्यक खर्च, हुंडा प्रथा आणि मुलींवरील छळ थांबवण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि उपाययोजना राबवेल.
अरविंद शिंदे यांनी बोलताना सांगितले की, आज झालेल्या या बैठकीनंतर अनेकांनी स्वत:च्या घरापासूनच या बदलाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. साधेपणाने लग्न करणे, फाजील खर्च टाळणे आणि अशा प्रकारच्या हुंड्याच्या मागण्या न करणे हे ठरवण्यात आले आहे. तसेच, ज्या कुटुंबांमध्ये मुलींचा छळ होईल, त्यांच्याशी ‘रोटी-बेटी’चा व्यवहार बंद करण्याचा ठराव देखील यावेळी झाला.
प्रवृत्तींवर बहिष्काराचा इशारा
चेतन तुपे यांनी सांगितले की, वैष्णवीप्रमाणे जर कोणत्याही मुलीवर हुंड्यासाठी छळ झाला तर त्या प्रवृत्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल. समाजात स्पष्ट संदेश जाईल की अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही. ही बैठक म्हणजे मराठा समाजात सामाजिक शुद्धीकरणाची सुरूवात मानली जात आहे. विवाहसंस्थेतील अनिष्ट प्रथांना छेद देत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीने पाऊल उचलणे अपेक्षित आहे.
नवीन सामाजिक नियमांची अंमलबजावणी
– लग्न सोहळे साधेपणाने करणे
– मोठ्या मंडळींच्या लग्नाचे अंधानुकरण टाळणे
– वेळेत लग्न करणे
– मुलगी छळली गेल्यास संबंधित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
– गाडी, सोने, अंगठी यांसारख्या देणग्यांचा सार्वजनिक निषेध
– अशा मागण्या करणा-याना थेट जाऊन समज देण्याचा निर्धार