मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेचा आज मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेसेनेतील फुटीर गटाच्या शिवसेनेतील (शिंदे गट) विलीनीकरणाला अधिकृत मान्यता दिली आहे. या राजकीय घडामोडीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा चेहरा असलेले ओमराजे निंबाळकर, चार वर्षांपूर्वी पक्षात पडलेल्या फुटीनंतरही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ओमराजे सुरुवातीला ठामपणे ठाकरेंसोबत होते. त्यांच्या विरोधामुळेच ही मोहीम काही काळ लांबणीवर पडल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या निर्णयाची माहिती देताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला असून, अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अनेक समर्थकांनी आपण त्यांच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली आहे. संतप्त नेटकऱ्यांनी त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या आधारावर पुन्हा निवडणूक लढवून निवडून दाखवावे, असे थेट आव्हान दिले आहे.
सोशल मीडियावर त्यांना ‘गद्दार’ असे संबोधले जात आहे. काही युजर्सनी त्यांना निष्ठावंत राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो फोल ठरल्याची टीका होत आहे. एका नेटकऱ्याने तर अत्यंत टोकदार प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की, या निर्णयामुळे केवळ राजकारणच नाही, तर सामान्यांचा लोकशाहीवर आणि लोकांच्या चांगुलपणावरचा विश्वासही उडून जाईल. ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय धाराशिवच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, ठाकरे गटाच्या खासदारांच्या गटात पडलेली ही फूट २०२६ मधील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे. आता ओमराजे निंबाळकर या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















