छत्रपती संभाजीनगर : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे, अन्यथा हे आंदोलन देशव्यापी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ही लढाई इथेच संपत नाही असेही दिपके यांनी स्पष्ट केले.
आज सोशल मीडियावर पोस्ट करत दिपके यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक आणि शांततापूर्ण लोकचळवळ असे म्हटले. त्यांनी म्हटले आहे की, काल आपल्यापैकी हजारो जणांनी इतिहास घडवला. जंतरमंतरवरील आपल्या शांततापूर्ण निदर्शनांनी सरकारला याची झलक दाखवून दिली की, जेव्हा आपण ‘झुरळं’ एकवटतो तेव्हा काय करू शकतो. अनेक जण प्रथमच आंदोलनात सहभागी झाले असून शिक्षण व्यवस्थेबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी ते रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता सहभागी झालेल्या आणि शांततापूर्ण निदर्शने हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे हे सिद्ध करणा-या तुम्हा प्रत्येकाचे मी आभार मानतो. शांततापूर्ण चळवळीचे सरकार काहीही वाकडे करू शकत नाही. आपल्यासारख्या ‘झुरळांना’ त्यांच्याकडून कधीही घाबरण्याची गरज नाही. पण हे प्रकरण इथेच संपत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी एका संपूर्ण पिढीवर अन्याय केला आहे. जर त्यांना पदावरून हटवले नाही किंवा त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला नाही, तर आम्हाला आमचा लढा प्रत्यक्ष रस्त्यावर सुरू ठेवावा लागेल, असे दिपके यांनी म्हटले आहे. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रंका शनिवारी आंदोलनानंतर म्हणाले की, सरकारला आम्ही सात दिवसांचा अवधी देत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांनी सन्मानाने राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधानांनी त्यांना पदावरून दूर करावे. अन्यथा ही चळवळ देशभर विस्तारेल. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे आणि त्या बदलाची सुरुवात आजपासून झाली आहे असेही रंका यांनी म्हटले.
भाजपकडून टिका
आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी अप्रत्यक्ष टीका केली. परदेशात बसलेले काही लोक भारतातील तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारतातील युवक काही मोजक्या लोकांच्या हातातील कठपुतळी बनणार नाहीत, असे त्यांनी म्हटले. नवीन यांनी असेही सांगितले की, देशातील युवक राष्ट्रनिर्मिती आणि स्वत:च्या भविष्याच्या उभारणीसाठी काम करू इच्छितात. काही जणांनी मात्र त्यांच्यावर व्यवस्थाविरोधी असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप त्यांनी केला.
सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून सीजेपीची सुरुवात
कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सोशल मीडियावरील मोहिमेच्या स्वरूपात झाली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही आठवड्यांतच या संघटनेला इन्स्टाग्रामवर २.२ कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
















