24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभेचा शंखनाद!

विधानसभेचा शंखनाद!

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक राज्यात ३५ दिवसांसाठी आचारसंहिता लागू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबरोबरच निकाल जाहीर होणार आहे.

झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला होता. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची माहिती देत दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले होते. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात माहिती देखील दिली.

आता, नियोजित पत्रकार परिषदेतून आज राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकांच्या घोषणेचा दिवस अखेर उजाडला असून महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळीसारखे फटाके फुटणार आहेत.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

राज्यातील २८८ मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात २९ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. म्हणजे, १५ दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचेही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

महाराष्ट्रातील वेळापत्रक
– निवडणुकीचे नोटिफिकेशन – २२ ऑक्टोबर
– अर्ज भरण्याची तारीख – २९ ऑक्टोबर
– अर्ज माघार घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर
– मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर
– मतमोजणी – २३ नोव्हेंबर
– निवडणूक प्रक्रिया समाप्त – २५ नोव्हेंबर

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
अर्ज भरण्याची तारीख – २९ ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर
मतमोजणी – २३ नोव्हेंबर

झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात
– पहिला टप्पा ४३
– नोटिफिकेशन १८ ऑक्टोबर
– अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २५ ऑक्टोबर
– अर्जांची छाननी २८ ऑक्टोबर
– अर्ज मागे घेण्याची तारीख ३० ऑक्टोबर
– पहिला टप्पा मतदान १३ नोव्हेंबर
– दुसरा टप्पा ३८ जागा

निवडणुकीची अधिसूचना
– २२ ऑक्टोबर २०२४
– अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर
– अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४
– अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर
– मतदान : २० नोव्हेंबर २०२४
– मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४
– निवडणूक प्रक्रिया समाप्त : २५ नोव्हेंबर २०२४

राज्यातील मतदारांची संख्या
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. ९.६३ कोटी मतदार असून ४.९७ कोटी पुरुष मतदार तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. त्यामध्ये, १.८५ कोटी तरुण मतदार आहेत, यंदा पहिल्यांदाच मतदान करणा-या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार १९.४८ लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख मतदार आहेत. राज्यात १०० वर्ष पूर्ण करणारे मतदार ४७,७७६ आहेत. तर, ८५ वर्षापेक्षा अधिक वय ४२ लाख ४३ हजार, तर ६.३६ लाख दिव्यांग आणि ६,०३१ तृतीयपंथी मतदार आहेत.

एकूण मतदान केंद्र – १ लाख १८६
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या ४२,६०२ तर ग्रामीण भागात ५७,५८२ बुथ केंद्र असणार आहेत. एका केंद्रावर मतदान ९६०, दिव्यांग सुविधा २९९, महिला अधिका-यांमार्फत चालवले जाणारी केंद्र मतदान केंद्र ३८८, तर मॉडेल मतदान केंद्र ५३० असणार आहेत.

मतदारांसाठी सुविधा पोर्टल अ‍ॅप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अ‍ॅप जारी करण्यात आले आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथे पोहचेल असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.

एटीएम वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणा-या गाडीला निवडणूक काळात रात्री ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवले जाईल.

सोशल मीडिया वापरकर्त्यांना वार्निंग
१७ सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झाले याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR