मुंबई : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. ईव्हीएम मशिनवर मोठा कॉन्फिडन्स आहे, असा टोला देखील राऊतांनी भाजपला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे.ईव्हीएम मशिनवर मोठा कॉन्फिडन्स आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा. तुम्ही ते ऐकत नाही कारण तुम्ही हरणार आहेत. तुम्ही स्वत:ला महाशक्ती मानत आहात. इतर देशांत बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. या ठिकाणी तुम्ही निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाहीत?
प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री आहेत. भाजप सत्तेत नसताना ते विरोधी पक्षात होते. विरोधकांचे काम आहे सत्ताधा-यांना प्रश्न विचारायचे. जर प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तर आम्ही उभे राहून प्रश्न विचारणार. तो संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आहे. अमित शहा यांनी संसदेत येऊन संसदेत घुसखोरी कशी झाली याचे उत्तर द्यावे तर ते त्याची उत्तरे बाहेर देतात, असेही संजय राऊत म्हणाले.