ICC Women’s T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वात बहुप्रतीक्षित लढतींपैकी एक असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज, रविवार (१४ जून २०२६) रोजी इंग्लंडमधील Edgbaston Cricket Ground येथे खेळवला जाणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांमधील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. त्यातच हा दोन्ही संघांचा यंदाच्या विश्वचषकातील पहिलाच सामना असल्याने या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तर मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टारद्वारे या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
भारताचे ऐतिहासिक वर्चस्व
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती नेहमीच चुरशीच्या झाल्या असल्या तरी आकडेवारी भारतीय संघाच्या बाजूने स्पष्टपणे झुकलेली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ सामन्यांपैकी तब्बल १३ सामन्यांत भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानला केवळ तीन वेळा भारतावर मात करता आली आहे. याच दमदार रेकॉर्डमुळे आजच्या सामन्यातही भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दबावाखाली कोणताही संघ धक्कादायक कामगिरी करू शकतो, त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रुप ए मध्ये कठीण आव्हान
यंदाच्या विश्वचषकात भारताचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तानसोबतच बलाढ्य ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांसारखे संघ आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे पाकिस्तानलाही कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवत आत्मविश्वास वाढवायचा आहे.
हरमनप्रीत कौरसमोर ऐतिहासिक टप्पा
भारतीय संघाची कर्णधार Harmanpreet Kaur हिच्यासाठी हा टी-२० विश्वचषक विशेष ठरणार आहे. तिच्या कारकिर्दीतील हा दहावा टी-२० विश्वचषक असून, महिला क्रिकेटमधील तिच्या दीर्घ आणि यशस्वी प्रवासाचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. याआधी अनेकदा उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतरही भारताला विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही.
फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार संतुलन
भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळतो. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांच्यावर संघाला वेगवान सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. मधल्या फळीत जेमिनहा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे. गोलंदाजीत दिप्ती शर्मा, रेणुका सिंग,राधा यादव आणि श्रीयांका पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या या संतुलित संघामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे.
चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
भारत-पाकिस्तान सामना म्हटले की क्रिकेटप्रेमींमध्ये वेगळाच उत्साह निर्माण होतो. पुरुष क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटमधील या प्रतिस्पर्ध्याची लोकप्रियताही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आजचा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून प्रतिष्ठा, अभिमान आणि विश्वचषकातील दमदार सुरुवातीसाठीची महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष आता एजबॅस्टनकडे लागले असून, या महामुकाबल्यात भारतीय महिला संघ विजयाने विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतो की पाकिस्तान धक्का देत इतिहास रचतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
















