मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा छडा लावण्याचा विडा उचलल्याने आरोपींना गुजरातमधून अटक करण्यापासून ते या प्रकरणात खोलात चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासात मुंबई क्राईम ब्रँचला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटर्सच्या दोन्ही बंदुका सुरतच्या नदीत सापडल्या आहेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात दोन्ही बंदुका वापरण्यात आल्या होत्या.
१४ एप्रिलच्या पटाहे सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन दुचाकीस्वारांकडून गोळीबार करण्यात आला. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी दोन आरोपींची नावं आहेत. दोघांना सुरतवरून अटक करण्यात आले आहे. दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळाबाराची संपूर्ण जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने स्वीकारली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचला गुजरातच्या नदीमध्ये सापडलेल्या बंदुकांनंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पोलिस त्याच नदीतील आरोपींचे फोन देखील शोधत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींनी अनेक वेळा बँकेत पैसे ट्रान्सफर केले आहेत. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच मोक्का लावणार आहे. मोक्का लागू केल्यानंतर गुन्हे शाखा लॉरेन्स बिश्नोई याला कारागृहातून ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईत आणणार आहे.
सलमान खानच्या घरावर एकूण १२ गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांना ते पूर्ण करता आले नाही. फक्त २ मॅग्झिन खाली करा. २ मॅग्झिन अर्थात १२ गोळ्या फायर करा, असे सांगण्यात आले होतं. मात्र हल्लेखोरांना १२ गोळ्या फायर करता आल्या नाहीत. त्यांनी फक्त ६ गोळ्या सलमानच्या घरावर फायर केल्या. गोळीबारानंतर दोघे गुजरातला पळाले.