धाराशिव (मछिंद्र कदम) : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (दि. ४ जून) शेवटचा दिवस होता. या दिवशी झालेल्या घडामोडींनंतर निवडणुकीतील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. रिंगणात असलेल्या ९ उमेदवारांपैकी ७ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.
महायुतीकडून भाजपचे माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख हे दोन प्रमुख उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीची शक्यता मावळली आहे. अर्चना विनोद गंगणे, अहमद राज सय्यद, महालिंगे मिलिंद गणपती, शरद रामभाऊ यादव, सचिन भारतराव पवार, सहाल बिन आमेर चाउस आणि संजय पांडुरंग मुंदडा या सात अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत १७ ने घट झाली आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका रखडल्यामुळे तेथील सदस्य संख्या कमी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यात ३६७, धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यात ३१७ तर बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यात ३०४ असे एकूण ९८८ मतदार आहेत.
दोन्ही प्रमुख उमेदवार मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असल्याने स्थानिक पातळीवर या निवडणुकीची चुरस वाढली आहे. ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून, मराठवाड्यातील आगामी राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येक मतासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, निकालाकडे आता तीनही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
















