जालना : स्वतंत्र कुणबी-मराठा मंत्रालय स्थापन करा अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सरकारला केली आहे. मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणा-या अंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा झाली आहे.
त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे ३० मेपासून सुरू होणारे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे यांनी येत्या ३० तारखेपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचे रान पेटले आहे. जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी नुकतेच प्रसाद लाड यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार लाड यांनी आज त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत प्रदीर्घ काळ चर्चा झाली. त्यात लाड यांना जरांगे यांना सध्याचा उन्हाचा कडाका व शेतीच्या मशागतीची कामे पाहता त्यांचे आगामी उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन केले.
प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे ऊन पडले आहे. तसेच खरीप हंगामाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना त्यांचे ३० मेपासून सुरू होणारे उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन आहे. सरकार आपल्या जागी आहे. मी मराठा समाजातर्फे त्यांना हे आवाहन करत आहे. मी गीतेतील सार घेऊन येथे आलो आहे. मुख्यमंत्री जातीचे नसतानाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. हा जरांगे यांचाच विजय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.
जरांगे व माझ्यात अनेकदा वाद
प्रसाद लाड म्हणाले, माझे व मनोज जरांगे यांच्यात अनेकदा वाद झाले हे मला मान्य आहे. मराठा समाजाचा लढा १९८१ पासून सुरू झाला. जरांगे यांनी लढा दिला. त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. त्याविषयी मी जरांगे यांचे आभार मानतो. मी त्यांना विनंती केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घ्या. मागील ७० वर्षांत कोणत्याही मराठा नेत्याने केले नाही, असे काम फडणवीस यांनी केले आहे. जरांगेंनी ३० मेपासून आंदोलन करू नये. सध्या उन्हाचे दिवस आहेत. मी आमदार व नेता म्हणून येथे आलो नाही. सामान्य समाजाचा माणूस म्हणून मी येथे आलो आहे. जरांगेंनी मला २३ तारीख दिली. पण मी २२ तारखेलाच येथे आलो. तुम्ही निमंत्रण दिले. तुमचा मान म्हणून आलो. तुमच्या मनात असलेला द्वेष दूर करायचा होता.
लाड यांना जरांगेंच्या भेटीआधी धमकीचा फोन
प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना धक्कादायक प्रकार घडला. लाड यांच्या पीएला आधी धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच दोन जणांनी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी संशयितांना अडवत चौकशी केली असता ते निवेदन देण्यासाठी आल्याचे सांगत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आणखी एक संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
















