अंबाला : वृत्तसंस्था
शेतीच्या वादातून एका माजी सैनिकाने आई, भाऊ, वहिनीसह पुतण्या आणि पुतणीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील अंबालामधील नारायणगड येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी भावाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. वडीलांनी विरोध केला असता त्यांनाही मारहाण केली. मारहाणीत वडील आणि भावाची दुसरी मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
हत्येनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. भाऊ हरीश (वय ३५), त्याची पत्नी सोनिया (वय ३२), आई सरोपी (वय ६५), पुतणी यशिका (वय ५) आणि पुतण्या मयंक (वय ६ महिने) अशी मृतांची नावे आहेत. जखमी वडील ओमप्रकाश यांच्यावर नारायणगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर भावाच्या एका मुलीला चंदीगड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही भावांकडे दोन एकर जमीन असल्याचे सांगितले जाते. या मार्गावरून वाद सुरू होता. अनेक वर्षांनंतर जमिनीवरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता. या रागातून आरोपी भावाने आई, भाऊ, वहीनीसह पाच जणांची हत्या केली.
हत्येची माहिती मिळताच अंबालाचे पोलिस अधीक्षक सुरेंद्र सिंह भौरिया रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.