परभणी/प्रतिनिधी
राज्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यास आरोग्य उपचार सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सर्व संबंधित यंत्रणांने आयुष्यमान भारत योजनेतंर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करुन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्याची कार्यवाही जलद पद्धतीने राबवावी, अशा सूचना आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आयुष्यमान भारत योजना आढावा बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शेटे म्हणाले की, देशातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकास आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा मोफत मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सुमारे ८० ते ९० टक्के नागरिकांना या योजनेअंतर्गत ५ पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. रस्ते अपघातातील उपचारासाठी प्रति अपघात रु. १ लाख एवढी मयार्दा वाढविण्यात आली असून याचा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच महापालिका क्षेत्रात आयुष्यमान कार्डची नोंदणी कमी असून नियोजन करीत या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी या मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सीएससी केंद्रांनी राष्ट्रकार्य म्हणून अधिकाधिक आयुष्यमान कार्डची नोंदणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही दिल्या.
राज्यभरात जवळपास १ हजार खासगी रुग्णालय पॅनेलवर असुन येणा-या कालावधीत आणखी ३५० रुग्णालयांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे. त्जिल्ह्यात या योजने अंतर्गत १३ रुग्णालये पॅनेलवर आहेत. आरोग्य यंत्रणांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यातील किमान दोन रुग्णालय पॅनेलवर येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश डॉ. शेटे यांनी दिले. यावेळी डॉ. शेटे यांनी आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा बाबत आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे आणि जिल्हा समन्वयक डॉ. संदीप गाडेकर यांनी सादरीकरणाद्वारे आयुष्यमान भारत योजनेतंर्गत जिल्ह्यात १२ लाख २२ हजार ५७१ लाभार्थ्यांपैकी ३ लाख ९२ हजार ३५ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले असुन उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करून कार्ड वितरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सादर केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.