नातेपुते : तीव्र हवामानापासून व कडक उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी सध्या प्रत्येक शेतकऱ्याकडे मजूर व स्त्रियांनी रोजंदारीवर येण्याच्या वेळा बदललेल्या आहेत. पूर्वी सकाळी १० ते पाच किंवा ११ ते पाच अशा कामाच्या वेळा होत्या. परंतु सध्याच्या तीव्र उन्हामुळे बहुतेक शेतकऱ्यांकडे पुरुष मजूर सकाळी सात ते १२ आणि महिला मजूर सकाळी आठ ते दोन अशा वेळेत काम करीत आहेत.
गेल्या आठवड्यात अवकाळीपाऊस व वादळी वाऱ्यामुळे तापमान घसरले होते. मात्र, सध्या सूर्य आग ओकत आहे. दमट आणि तीव्र हवामान आहे. जिवाची लाही लाही होत आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठा ओस पडत आहेत. शासकीय आणि खासगी कार्यालये पंखे, एसी, कुलर या सुविधांमुळे सुरू असतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचे? उन्हात काबाडकष्टाशिवाय त्यांना पर्यायच नाही. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात काम करण्यापेक्षा सकाळी लवकर कामाला सुरवात करून दुपारच्या उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदलल्या आहेत.