अक्कलकोट :सोलापूर जिल्ह्यातील क्षयरुग्ण संख्येचा सर्व्हे झाला असून जिल्ह्यात, तालुक्यात झालेल्या नवीन सर्व्हेनुसार अक्कलकोट तालुक्यात १३९ क्षयरुग्ण आढळले आहेत, तर जिल्ह्यात एक हजार ७८७ क्षयरुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण ३८५ बार्शी तालुक्यात, तर सर्वांत कमी रुग्ण २९ उत्तर तालुक्यात आढळले आहेत.
क्षय रुग्णांसाठी पुरेशा गोळ्या, औषधे मिळत नसून तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. हे. यामुळे सलग सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण करण्याचे रुग्णांसमोर मोठे आव्हान उभे आहे. संबंधित विभागाने केलेल्या तपासणीत क्षयरोग(टीबी) रुग्ण निष्पन्न झाले, तर त्यांना शासकीय रुग्णालयातून सहा महिने गोळ्या, औषधांचा कोर्स करणे आवश्यक असते. असे असताना संबंधित विभागाकडे गोळ्या, औषधे मुबलक असणे आवश्यक आहे. त्याची सोय संपण्यापूर्वी करण्यात आली नाही. परिणामी, सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. यामुळे कोर्समध्ये सातत्य ठेवण्याचे रुग्णासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यावर कसा मार्ग काढण्यात येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात गोळ्या, औषधे शासनाकडून वेळेत येण्यास कधी कधी काही अडचणी निर्माण होत असतात, तेव्हा जिल्ह्यात ज्या सेंटरला साठा अधिक असतो, तेथून किंवा दुसरा एक पर्याय असतो, त्या माध्यमातून प्रश्न निकाली काढणे आवश्यक असते. त्यासाठी संबंधित टीमने मुख्यालयाशी समन्वय ठेवणे आवश्यक असते. त्याकामी काही ठिकाणी कमी पडल्याचे दिसते. वेळीच लक्ष घालून अडचणी दूर करू.असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे यांनी सांगीतले.अक्कलकोट १३९, पंढरपूर २४७, सांगोला २०४, उत्तर सोलापूर २९, मोहोळ२०६, अकलूज ११०, माळशिरस ९१, माढा ९०, करमाळा १०८, बार्शी ३८५, मंगळवेढा ७९, दक्षिण सोलापूर ९९ अशा एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात एक हजार ७८७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना सहा महिने सातत्याने कोर्स करणे आवश्यक आहे. गोळ्या, औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे.