येरमाळा : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील पानगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलाच्या डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडील जमीन विक्री करण्यास नकार देत होते. वारंवार सांगूनही शेत विकण्यास वडील सहमती देत नसल्याने मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून ठार केले. ही घटना रविवारी दि. १० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. देवीदास भाऊराव वाघमारे (वय ६८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खून करणा-या आरोपी बालाजी देवीदास वाघमारे याला तातडीने अटक केली आहे.
पानगाव ता. कळंब येथील देविदास भाऊराव वाघमारे (वय ६८) हे सुगीचे दिवस असल्याने शनिवारी दि. ९ मार्च रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले होते. ते रविवारी सकाळी शेतात मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा मयताच्या मुलाने शेतीच्या वादातून वडिलांना मारल्याची माहिती देवून चार संशयितांची नावे सांगितली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी घटनास्थळी भेट दिली. येरमाळा पोलिसांना तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्र्णी यांनी मार्गदर्शन केले.
आरोपी बालाजी वाघमारे याच्यासह चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयताचा मुलाने वडील आपल्याला झालेले कर्ज फेडण्यासाठी वारंवार सांगूनही शेत विकण्यास सहमती देत नसल्याने वडिलांना झोपेतच डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली दिली. मयताची पत्नी वृंदवणी देविदास वाघमारे (वय ६५) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा बालाजी देविदास वाघमारे (वय २८) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.