मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर आज (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मुंबई पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. गोळीबार करणा-या व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे गृह खात्याचे अपयश आहे.
सुप्रिया सुळे अठक सोबत बोलताना म्हणाल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दूधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे.
आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो, हे असे ठिकाण आहे जिथे लोक शांततेत राहतात, पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे. मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना ओळखण्यासाठी आम्ही परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. ३ राऊंड फायरिंग करण्यात आले, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. घटनेनंतर क्राईम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर झाली असून गोळ्यांच्या खुणा तपासत आहेत.
सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गर्दी करतात. ईदनिमित्त सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.