29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeपरभणीनिर्जळीच्या विरोधात संतप्त पुर्णेकरांचा घागर मोर्चा

निर्जळीच्या विरोधात संतप्त पुर्णेकरांचा घागर मोर्चा

पूर्णा : शहरात मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरीकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरीकांवर आली असून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दि.१६ रोजी शहरातील आंबेडकर नगर येथून नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पूर्णेकरांना ताबडतोब पाणी उपलब्ध करून द्यावे. दरवर्षीच्या पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर करणारा उपाय करावा. झिरपणारा बंधारा पाडून नव्याने मजबूत बंधारा बांधण्यात यावा. उपलब्ध असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करण्यात यावे. विभागनिहाय अनिश्चित वेळामुळे वाया जाणारे पाणी वाचवून विभागनिहाय गरजेनुसार आणि संबंधित ठिकाणाच्या चढउतारानुसार वेळानिश्चित करण्यात याव्यात. शहरातील जुन्या झालेल्या पाईपलाईनमुळे ठीकठिकाणी पाणी वाया जात असल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात. शहरासाठी मंजूर झालेले फिल्टर तातडीने सुरू करण्यात यावे व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. पाण्याची समस्या निर्माण होत असेल तर नागरिकांना नियमितपणे दवंडीद्वारे कळविण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा घागर मोर्चा काढण्यात आला होता.

याप्रसंगी जिल्हा सचिव नसीर शेख, जय इंगळे, प्रबुद्ध काळे, सुबोध खंदारे, राजू गायकवाड, अमोल पटेकर, वैभव जाधव, निशांत डंके सुमित गायकवाड, माधव अंभोरे, दादाराव जोंधळे, राहुल खर्गखराटे, दुर्गेश वाघमारे, तुषार इंगोले, अभिजीत बलखंडे, सागरबाई गजभारे, अनिताबाई भारत अरुणाबाई जाधव मन्नू खंदारे, छाया कांबळे, वंदनाबाई गायकवाड, नंदाबाई धनगावे, राधाबाई सोनुले, कांताबाई वाघमारे, गीताबाई गजभारे, आशाबाई खुले, सावित्रीबाई कांबळे, जनाबाई जोंधळे, छाया खरे, सुकेशनी भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील महिला घागर घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR