मुंबई : रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडले. सोलापूर येथे तापमान २.३ अंशांनी वाढून ४३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
रविवारी बहुतांश शहरात तापमानाने ओलांडली चाळिशी- कुलाबा वेधशाळेत ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ठाण्यात कमाल तापमान ४०.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर (४०.७), जळगाव (४२.२), नाशिक (४१.२), कोल्हापूर (४०.३), नांदेड (४२.४), पालघर (४२), परभणी (४२.८), सांगली (४१) आणि सातारामध्ये ४०.५) अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
नांदेडचा पारा गेला ४२.४ अंशांवर
गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने वातावरणातील बदलामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असून, रविवारी मागील चोवीस तासांत नांदेड जिल्ह्यात या वर्षातील सर्वाधिक ४२.४ सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात सूर्य आणखी कोपण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात उष्णतेची लाट
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. रविवारी या महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदले गेलं. ४१ अंश सेल्सियस तापमानामुळे कोल्हापूरकरांची अक्षरश: दैना झाली. दिवसा उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे. पुण्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशपर्यंत वाढत आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका बसत असल्यानं रस्त्यांवर कमी गर्दी पाहायला मिळत आहे.
उष्माघात कक्षाची स्थापना
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हात फिरणा-या व्यक्तींला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष ’ सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांनी दिली आआरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व जनतेने यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.