कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्येच ममता सरकारवर थेट निशाणा साधला. कोलकात्यातील परिवर्तन संकल्प यात्रा सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्यक बनवले जात आहे. आता या निर्मम सरकारचा अंत निश्चित असून बंगालमधून महाजंगलराजचा खात्मा निश्चित आहे.
तृणमूल काँग्रेसने सभेला येणा-या नागरिकांना चोर म्हणून संबोधल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, खरे चोर कोण आहेत हे बंगालची सुजाण जनता ओळखून आहे. आपली सत्ता जात असल्याचे पाहून येथील सरकार सैरभैर झाले आहे. ते केंद्र सरकारच्या योजनांमध्ये अडथळे आणत आहेत. या योजनांसाठी राज्याला एक पैसाही द्यायचा नाही, तरीही केंद्राच्या योजनांचा लाभ बंगालमधील जनतेला मिळू नये, असे इथल्या सरकारला वाटते. असा आरोप त्यांनी केला.
आयुष्मान भारत योजनेवरून निशाणा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आयुष्मान भारत योजनेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, टीएमसी सरकार आपल्या स्वार्थी राजकारणामुळे ही योजना राज्यात लागू करत नाही. यामुळे बंगालमधील कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांपासून वंचित राहत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेचा उल्लेख
याशिवाय, पंतप्रधान आवास योजनेच्या यशासंदर्भात भाष्य करताना मोदी म्हणाले, देशभरातील गरिबांना पक्की घरे मिळत असताना बंगालमध्ये मात्र या योजनेचे नाव बदलण्यात आले. लाभार्थ्यांच्या यादीत फेरफार करण्यात आले, यामुळे ज्या गरिबांना हक्काचे घर मिळायला हवे होते, ते आजही प्रतीक्षेतच आहेत. केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर आरोग्यासारख्या महत्त्वाच्या योजनांमध्येही टीएमसी राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.
