सोलापूर : सोलापूर येथे मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 13 मार्च रोजी ‘थाळीनाद आंदोलन’ करण्यात आले. महापूर निवडीत समाजाला डावलून कथित राजकीय अन्यायाच्या निषेधार्थ चार हुतात्मा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोलापूरमधील भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर मराठा समाजाला प्रमुख पदांपासून दूर ठेवत राजकीय अन्याय केल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने मतपेटीतून उत्तर दिले. विधानसभेत समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्ता मिळाली. मात्र महापौर पदाच्या निवडीवरून समाजाला डावलल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत ५५ पेक्षा अधिक जागांचे लक्ष्य असताना भाजपला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले, असा दावा आंदोलक राम जाधव यांनी केला.
१९९३ नंतरच्या ३२ वर्षांत सर्व समाजघटकांना महापौरपदाची संधी मिळाली; मात्र यंदा सर्वसाधारण गटासाठी जागा असतानाही मराठा समाजाला संधी नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षपद, मंगळवेढा तालुक्यातील उमेदवारी तसेच प्रमुख पदांवरील प्रतिनिधित्वाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. अन्यथा याची तीव्रता राज्यभर वाढेल, असा इशाराही राम जाधव यांनी दिला.

