29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमराठ्यांनी ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल

मराठ्यांनी ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

जालना : मराठ्यांचा आणि माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. आम्ही अटकेपार झेंडे लावणारे मावळे आहोत. आम्ही जर मनावर घेतले तर यांचा आवाज पाच मिनिटांत बंद होईल असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरून देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडू न देता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण किती दिवसांत देणार? कसे देणार? किती दिवसांत देणार?, तुमच्या अडचणी काय आहेत? हे एकदा सरकारने सांगावे. आमची दिशाभूल करण्यासाठी हे चालले आहे का? एकदा तुम्ही चर्चेला या. आम्हाला जर वाटले की मुदत द्यायची आहे तर देऊ. वेळकाढूपणा करत आहेत असे वाटले तर आम्ही वेळ देणार नाही. मुदत दिली तरीही आंदोलन मागे घेणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाज कुणालाही त्रास देणार नाही चर्चेसाठी या, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आम्ही आता कुणाच्याही धमक्यांना भिणार नाही. ४० वर्षे आमचे आरक्षण फुकट खाता का? तू ये बरं रस्त्यावर.. आम्ही शांततेने तुला उत्तर देतो. फुकट आमचे आरक्षण खाता आणि सांगायचे लोक रस्त्यावर उतरतील. उतर रस्त्यावर जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. त्यातल्या एका उपमुख्यमंत्र्यांची तर नक्की जबाबदारी असणार आहे. किती दिवसांत आरक्षण देणार याची घोषणा करा. आपल्या गावात नेत्यांना येऊ देणार नाही म्हणजे नाही. आपल्याला यांना भिडायचं आहे. लढून मरायचे आहे. भेकडासारखे मरणार नाही. कुणीही आत्महत्या करायची नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे कसे आरक्षण देत नाहीत आणि कुणा कुणाला आपल्या विरोधात उभं करतात आपण पाहू. सरकारला मजा बघायची ना? ती मजाच दाखवायची आहे. आपणच ५० टक्के आहोत. आरक्षण द्यायची वेळ आली तर रस्त्यावर येईनच्या गोष्टी करत आहेत त्यांनी तर लक्षात ठेवावे. सरकारमधला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे. त्याच्याकडे बघावे लागत आहे. बाळा तू लोकांना थांबव, उगाच परिस्थिती बिघडू देऊ नको. एक तर याने सगळा भाजप विद्रुप करून टाकला. रंगीबेरंगी पक्षात आणि सरकारमध्ये आणून ठेवलेत. आम्ही तुमचा आदर करत होतो कालपरवापर्यंत. पण तुम्ही काड्या करायला लागले. तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या. तुमचा रुलच आहे पहिल्यापासून लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय तुमचे जमतच नाही. असे म्हणत फडणवीसांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR