छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणा-या छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन डीएमआयसीला एक मोठा धक्का बसला असून अमेरिकन लुब्रिझोल या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली तब्बल १,९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेतली आहे. या मोठ्या औद्योगिक नुकसानीवरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत परदेशात आहेत आणि इकडे राज्यातून उद्योग फरार होत आहेत असा सणसणीत टोला दानवे यांनी लगावला आहे.
अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत सत्ताधा-यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले आहेत. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करून भाषण केले होते. याचाच संदर्भ देत दानवे म्हणाले की १७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री भाषण करत असताना मराठवाड्याला हेच रिटर्न गिफ्ट मिळाले का? एका बाजूला विकासाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे हातात आलेले मोठे उद्योग राज्याबाहेर घालवायचे, असा थेट आरोप त्यांनी यातून केला आहे.
१,९१४ कोटींचा फटका, रोजगार बुडाला
बिडकीन येथील ऑरिक सिटीमध्ये लुब्रिझोल कंपनीचा मोठा प्रकल्प उभा राहणार होता. यातून तब्बल १,९१४ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मराठवाड्यात येणार होती, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. मात्र, कंपनीने अचानक ही गुंतवणूक थांबवून आपला १२० एकरांचा भूखंड सोडल्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून विरोधकांनी आता रान उठवण्यास सुरुवात केली आहे.
उद्योगांचा दुष्काळ पाडू नका!
राज्य सरकारकडून वारंवार दावा केला जातो की, आम्ही असे काम करत आहोत की ‘पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. सरकारच्या याच दाव्याची खिल्ली उडवत अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी सरकारला थेट इशारा दिला आहे. पुढची पीढी दुष्काळ पाहणार नाही म्हणणारे, आता उद्योगांचा दुष्काळ पाडू नका फक्त! असा खोचक सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. या नव्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा उद्योग पळवल्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
















