बेलफास्ट: टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ३४ धावांनी पराभव केला. सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १८.५ षटकांत अवघ्या १४८ धावांवर आटोपला. या पराभवासोबतच भारतीय खेळाडूंच्या नावावर काही लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या सर्व ११ सामन्यांत भारताने विजय मिळवला होता. २००७ मध्ये या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताला पराभूत करणारा आयर्लंड हा जगातील ११ वा संघ ठरला आहे.
सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ जेव्हा झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता, तेव्हाही पहिल्याच सामन्यात असाच पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची आयरिश फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात ४ षटकांत तब्बल ५७ धावा दिल्या. यापूर्वीच्या टी-२० सामन्यात त्याने ६८ धावा दिल्या होत्या. यामुळे सलग दोन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत मिळून सर्वाधिक १२५ धावा देणारा तो गोलंदाज ठरला आहे. सामन्यातील १७ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला आयर्लंडच्या गॅरेथ डेलनीने सलग ३ षटकार ठोकले आणि या एकाच षटकात आयरिश फलंदाजांनी २७ धावा चोपल्या. आयर्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महागडे षटक टाकणारा तो भारतीय गोलंदाज बनला आहे.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा हा पहिलाच सामना होता. दुर्दैवाने, कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांनाही आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून पराभवाचा सामना करावा लागला होता.
















