28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeछत्रपती संभाजीनगरभाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

इतिहास पुसण्याची भाषा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर हल्ला अरविंद देशमुख यांनी व्यक्त केला संताप

जालना : प्रतिनिधी
लोकनेते पोस्टरवर नव्हे, लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयांवर सत्तेची मस्ती कधीच चालत नाही, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाने संतप्त भावना व्यक्त करत लोकनेते आणि माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा इतिहास पुसण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निषेधार्थ त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी जुना जालना भागात करण्यात आलेल्या या आंदोलनात अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विश्वंभर तिरुके, मंगेश मोरे, धनंजय पोहेकर, सागर पाटील, किरण देशमुख, योगेश सोळंके, अर्जुन गायकवाड, आनंद जाधव, नितीन सुरुंग, गणेश सोळंके, अर्जुन घारे, शुभम नवघरे, गणेश कापसे, गजानन खराबे, कार्तिक काळे आदी उपस्थित होते. लातूर येथे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपचा असभ्य, असंस्कृत आणि विखारी चेहरा उघडा पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ही साधी टीका नसून सत्तेची मस्ती आणि गुर्मी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अरविंद देशमुख म्हणाले की, लोकनेत्यांचे नाव पुसण्याची भाषा वापरणे म्हणजे इतिहास, लोकभावना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा थेट अपमान आहे.

मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. हा मोर्चा सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी उभा असलेला असून समतोल, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा आहे. लातूर असो वा संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या मनातून विलासराव देशमुखांचे नाव कोणीही पुसू शकत नाही. नेतृत्वच जर विखारी असेल, तर कार्यकर्त्यांना कोणते संस्कार दिले जात आहेत, हा गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव देशमुख हे सुसंस्कृत, खानदानी आणि लोकनेते म्हणून कायम स्मरणात राहिले आहेत.

विरोधी विचारधारांमध्ये असूनही त्यांची मैत्री गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत आदर्श मानली जात होती. त्या काळात मतभेद होते; पण त्याहून मोठ्या होत्या राजकीय मर्यादा, परस्पर सन्मान आणि सभ्यता. मराठा क्रांती मोर्चा अशा घाणेरड्या आणि इतिहासविरोधी राजकारणाचा जाहीर निषेध करीत असून, लोकनेते पोस्टरवर नव्हे, लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयांवर सत्तेची मस्ती चालत नाही, याची जाण रवींद्र चव्हाण यांनी असू द्यावी असे अरविंद देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR