नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलाचे सतत ऑपरेशन सुरू असते. सुरक्षा दलाचे जवान बिजापूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गांगलूर परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नेंद्रा कोरचोलीच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये आज (दि. २) सकाळी चकमक झाली.
यात ११ नक्षलवादी ठार, तर ७ नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेंद्रा-कोरचोली जंगलात नक्षलवादी असल्याच्या माहितीवरून डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, बस्तर फायटर आणि सीएएफच्या जवानांनी गांगलूर पोलिस ठाण्यात संयुक्त कारवाई केली. सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात ११ नक्षलवादी ठार झाले.