23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये मराठा-वंजारी वाद विकोपाला

बीडमध्ये मराठा-वंजारी वाद विकोपाला

 बीड : लोकसभा निवडणुकांतील प्रचारादरम्यान बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळाले.  बीड हे मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा असल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र बनले होते. त्यातच, बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या लढतीवेळी काही प्रमाणात मराठा-वंजारी वाद स्थानिक पातळीवर दिसून आला. तर, निवडणुकांनंतरही तो जातीय वाद पुन्हा उफाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, मराठा-वंजारी समाजात एकमेकांच्या दुकानातून खरेदी केल्यास दंड आकारण्यात येईल, असे सांगणारे काही व्हिडिओ समाजमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानंतर, आता बीडचे पोलिस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले होते.

बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. कारण याच राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावक-यांमध्ये उमटले. दोन गावांतील वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काही खरेदी करू नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचे दिसूनआला. अचानक हे गावकरी संतप्त का झाले? कोणती शक्ती यामागे आहे? नेमके कोण विष कालवत आहे? या अुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगत आहेत. त्यासंदर्भात आात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील यांनी बाजू मांडली आहे.

पोलिस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले
लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत. त्यातच मुंडेवाडी गावात वंजारी समाजातील नागरिकांनी मराठा समाजाच्या व्यक्तीकडून खरेदी करू नये, असा निर्णय घेतल्याची समोर आणल्यानंतर बीडचे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही केल्यास पोलिस दंड आकारणार आहेत. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंडेवाडीत पोहोचले असून याबाबत अधिक तपास करत आहेत.

मी जातीवाद होऊ देणार नाही – जरांगे पाटील
बीड जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना माझं आवाहन आहे, शांततेत राहा, आता वेळ निघून गेली आहे. यापूर्वी देखील मराठा शांत राहिला आहे. लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू. अगोदर कोणाचे नाव घेतले नाही, त्यावेळेला नाव घेऊ, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. वंजारी आणि मराठा समाजाचे कधी कुणाचे बांध कापलेत? तुम्हाला मतदान केलं तर चांगलं नाही केलं तर वाईट ही कसली लोकशाही?. मी कधी ओबीसी मराठा जातीवादी केला. मात्र, ग्राउंड लेव्हलवर कोण्या ओबीसीसोबत मी जातिवाद केला हे दाखवा. सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले होते, धनुभाऊ आणि पंकजा मुंडे कधीही जातिवाद करत नाहीत आता हे काय आहे? असा सवालही जरांगेंनी विचारला आहे.

सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे – सोनवणे
मुंडेवाडी हे गाव चांगले आहे, तेथील लोक जातीवादावर काम करणारे नाहीत. केवळ वंजाराच नाही, तर दलित, बौद्ध समाजही गावात आहे. माझ्या केज तालुक्यातील ते गाव असल्याने मला चांगले माहिती आहे. यापूर्वीही त्या गावाने वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केले आहे. मात्र, या गावाने अशा पद्धतीने टोकाचे आवाहन करणे हे चुकीचे आहे. माझे गावातील सर्वांनाच आवाहन आहे की, आपल्या संस्कृतीला जपण्याचे काम आपण केले पाहिजे. बहुजन समाजात सर्वचजण आले, सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, असे बजरंग सोनवणेंनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR