नागपूर : राजस्थान, पंजाब ते मध्य प्रदेशपर्यंत उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली असताना नागपूरकरांनाही उष्ण लाटांच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. २४ तासात तापमानात १.२ अंशाची वाढ होत ते थेट ४४.२ अंशावर उसळले आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पारा ४४ च्यावर गेला होता, जे राज्यात सर्वाधिक होते. त्यानंतर संपूर्ण मे महिना गारवा दिल्यानंतर जून महिन्यात सूर्य पुन्हा आब ओकायला लागला आहे.
हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात वादळ, विजा व मेघगर्जनेसह किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सोमवारी सकाळी आकाशात ढगांची उपस्थिती नगण्य होती. त्यामुळे सूर्याचा ताप अधिक तीव्रपणे जाणवला. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली पण सावलीपेक्षा उन्हाच्या झळा त्रासदायक ठरल्या होत्या. ढगांच्या उपस्थितीत दमट वातावरणामुळे उष्णतेचा प्रकोप अधिकच वाढला होता. सायंकाळच्या दरम्यान शहरात काही ठिकाणी सोसाट्याच्या वा-यासह हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे थोडा गारवा जाणवला. पण नागपूरकरांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दोन दिवसापासून तापमान वधारले आहे. वर्धा ४३.५ व ब्रम्हपुरी ४३.२ अंशावर पारा गेला. गोंदिया, भंडारा व अमरावती ४२ अंशाच्यावर, तर चंद्रपूर, अकोला, यवतमाळात पारा ४१ अंशावर गेला आहे. मे महिन्यात शांत राहिलेला सूर्य जूनमध्ये आग ओकायला लागला आहे. हवामान विभागाने पुढचे चार दिवस मेघगर्जना, वादळ व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा वळव्याचा पाऊस असेल.
दरम्यान आठ-दहा दिवसांपासून खोळंबलेला मान्सून विदर्भात व उर्वरित महाराष्ट्रात १३ जूनपासून पुन्हा सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भाचे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात त्याची सक्रियता अधिक असेल. नागपूरकरांना मात्र चांगल्या पावसाची वाट पहावी लागेल.