श्रीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर, कलम ३७० आणि पीओके(पाकव्याप्त काश्मीर)चे मुद्दे पुढे येत आहेत. अशातच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले की, भारत पाकव्याप्त काश्मीरवरील आपला दावा कधीही सोडणार नाही. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, संरक्षण मंत्री असा विचार करत असतील की, ते अतिशय आरामात पीओके घेतील, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, पाकिस्ताने बांगड्या घातलेल्या नाहीत.पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे शांतता आणि विकास परत आला, लवकरच पीओके भारतात विलीन करण्याची मागणी केली जाईल. पीओके हा भारताचा भूभाग होता, आहे आणि राहील. पीओके घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागणार नाही, कारण तेथील लोकच म्हणतील की, आम्हाला भारतात विलीन व्हायचे आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला. मात्र, त्यांनी कोणतीही टाइमलाइन दिली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच एएफएसपीएची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका जाहीर होतील, असे भाकित फारुख अब्दुल्ला यांनी केले. ते म्हणाले की, प्रमुख समस्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची आहे. दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करुन प्रश्न सोडवले पाहिजेत.