22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रसाने गुरुजींच्या पुस्तकांचा इतर भाषांत अनुवाद व्हावा : सुधा साने

साने गुरुजींच्या पुस्तकांचा इतर भाषांत अनुवाद व्हावा : सुधा साने

  अमळनेर : प्रतिनिधी
‘श्यामची आई’ या पुस्तकाचा तेरा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच जपानी, चिनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजेत. याकरिता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली आहे. साने गुरुजींचे सव्वाशेवे जन्मवर्ष आहे.त्यांच्या साहित्यांची खूप गरज आहे. येणा-या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.

साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सत्कार माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना साने यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, १९२३ सालच्या जुलै महिन्यात गुरुजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले. खान्देशाच्या मातीत एकरूप झाले. कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले. त्यांनी ५० वर्षांच्या आयुष्यातील साडेआठ वर्षे तुरुंगात काढले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. १९२४ साली त्यांनी प्रथम पुस्तक लिहिले. १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या कर्मभूमीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कामांची दखल घेतली हा त्यांचा गौरव समजते असेही त्या म्हणाल्या.

साने गुरुजी या परिसंवादात साने गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर समग्र विचारमंथन करण्यात आले. यात प्रामुख्याने साने गुरुजी यांना नेहमीच मातृहृदयी लेखक म्हणून ओळखले जाते परंतु, त्यांची ओळख तेवढीच नव्हती. ते समाजसुधारक, कामगार नेते, विचारवंत, स्त्री आणि दलितांसाठी चळवळ उभारणारे नेते म्हणून पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी साने गुरुजी यांच्याकडे साधन नसताना देखील वेगवेगळे कार्य सिध्दीस नेले असल्याचे सांगितले. डॉ. ललित अधाने म्हणाले की, साने गुरुजी यांना असामान्य व्यक्तिमत्त्व लाभले होते. ते सर्व पिढीचे आवडते लेखक आहेत. प्रा. लक्ष्मण गंगाधर सोनवणे म्हणाले की, साने गुरुजी यांचे जीवन एक कोडे बनले आहे. गुरुजींनी लेखक, विचारवंत, स्वातंत्र्यवीर, कामगार नेते अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. येरवडा कारागृहात असताना त्यांची आचार्य विनोबा भावे यांची भेट झाली होती. यातून त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.

बावनकुळे म्हणाले की, साने गुरुजी यांनी शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे. यात त्यांनी लेखक, संत, स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्य केले. प्रकाश पाठक म्हणाले, गुरुजींनी मातृधर्माला कुटुंब धर्माची जोड दिली. वसुंधरा कुटुंब…नुसार त्यांनी संपूर्ण जगावर प्रेम केले. त्यांचे जीवन समता-स्वातंत्र्य -बंधुता यांनी जोडले आहे. अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’सोबत त्यांच्या सोन्या मारोती, संध्या, सुधास पत्र यांचे वाचन केले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR