आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे २०० ते ३०० तरुणांनी रस्त्यावर एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. तर काहींनी हातात लाकडी दांडे आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार घडला आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यातच संतोष हत्या प्रकरण आणि खोक्या प्रकरण ताजे असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी गावात दोन गट परस्परांशी भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बीड ची ओळख आता गुन्हेगारी जिल्हा म्हणून होताना दिसत आहे.
दगडफेकीत गावातील नागरिक जखमी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आष्टीच्या खडकत गावामध्ये एका चौकात झेंडा लावण्यावरून हा वाद सुरू झाला. हा वाद अति टोकाला पोहोचल्यानंतर दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील झाली. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत गावातील नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सध्या या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.