रायबरेली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील विविध पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा खेळ सुरू केला आहे. यामध्ये ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत तेही अर्ज मागे घेऊन इतर पक्षात प्रवेश करत आहेत. असाच प्रकार स्वामी प्रसाद मौर्य यांचा मुलगा उत्कर्ष मौर्य यांनी केला असून, उत्कर्ष यांनी कुशीनगरमधून आपली उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्कर्षचे पक्षात स्वागत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मौर्य यांनी मनोज पांडे यांच्या विरोधात उंचाहारमधून विधानसभा निवडणूक लढवली आहे. उत्कर्ष यांचा पक्षात समावेश करून काँग्रेसने मनोज पांडे यांना कोंडीत पकडण्याची रणनीती सुरू केली आहे. मौर्य उंचाहार रायबरेली येथील आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुत्र असलेले उत्कर्ष मौर्य यांनी यूपीच्या कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत मनोज पांडे?
दरम्यान सपा नेते मनोज पांडे यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपने पांडेंना आपल्या पक्षात घेतले आहे. मनोज पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी राजकारणात असो किंवा नसू मात्र, सनातनसोबतच राहणार असे म्हटले होते. तर मनोज पांडे यांना घेरण्यासाठी काँग्रेसने उत्कर्षला आपल्या पक्षात सामिल करून घेतले आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या परिवाराचे रायबरेलीत आपल्या समाजात चांगलेच वजन आहे.