नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याचे काम एनआयएकडून सुरू आहे. त्यासाठी कसून तपास केला जात आहे. या तपासातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ४ दहशतवाद्यांपैकी २ दहशतवादी जम्मूतील कठुआ येथून भारतात आले आणि पर्यटकात मिसळले. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना एका फूड कोर्टमध्ये एकत्र केले आणि तेथे चौघांनी मिळून बेछूट गोळीबार केला. यात २७ पर्यटक मारले गेले.
पहलगाम हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांपैकी दोघेजण दक्षिण काश्मीरमधील होते. ते यापूर्वी अटारी सीमेवरून पाकिस्तानला गेले होते. पण ते भारतात कधी परतले, याची कोणतीही नोंद नाही. ते जम्मूतील कठुआ मार्गे भारतात परतले, असे मानले जाते. दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि पर्यटकांमध्ये मिसळले आणि त्यांना फूड कोर्टमध्ये गोळा केले. यानंतर इतर २ दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि गोळीबार केला. गोळीबार करणारे दहशतवादी पाकिस्तानचे होते, असे सांगण्यात आले.
दहशतवादी ४ ते ५ दिवसांपासून बैसरनच्या आसपास रेकी करत होते. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. वायरलेस चॅट्समधून मिळालेल्या गुप्तचर माहितीवरून असेही दिसून आले की, दहशतवादी त्याच भागात होते. पण त्यांच्या संवादाचे प्रकार वेगवेगळे असल्याने संभाषण समजू शकलेले नाही. सशस्त्र दहशतवादी मुक्तपणे फिरत आहेत, याची सरकारला चिंता आहे. या दहशतवादी हल्ल्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांना या धोक्याची माहिती मिळाली होती. श्रीनगरमधील हॉटेलमध्ये राहणा-या पर्यटकांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी ती माहिती होती. त्यामुळे शोध मोहीमही राबविली, असेही या अधिका-याने सांगितले.
घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त
सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणांवरून स्रायपर रायफल्स, एम-सिरीज रायफल्स आणि चिलखत छेदणा-या गोळ््यांसारखी आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत. ही अफगाणिस्तानातील नाटो सैनिक दलातील उरलेली शस्त्रे असल्याचा संशय आहे.