नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२६) ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे २००० रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीदेखील केली. २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा १९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाईल.
५५४ स्थानकांचे स्वरूप बदलणार
प्रवाशांचा प्रवास सुखकर सुधारण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५४ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. यासोबतच भारतभर ओव्हरब्रिज आणि अंडरपासचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, भारत आता मोठी स्वप्ने पाहतोय आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कामही करतोय. या कामांमुळे लोकांचे जीवन अधिक सुलभ होईल.
१९,००० कोटींहून अधिक किमतीचा प्रकल्प
२७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा १९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाईल. ही स्थानके शहराच्या दोन्ही बाजूंना एकत्रित करून ‘सिटी सेंटर’ म्हणून काम करतील. या स्थानकांमध्ये रुफटॉप प्लाझा, सुंदर लँडस्केप, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, सुधारित आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याची जागा, किओस्क, फूड कोर्ट इत्यादी आधुनिक सुविधा असतील. पर्यावरणस्रेही आणि अपंगांसाठी अनुकूल असा पुनर्विकास केला जाईल. स्थानकांच्या इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल.