छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत आहे. विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टाळली जाणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी शहागंज येथे काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, की अर्थव्यवस्थेचा विकास दर खूपच खाली घसरला. बेरोजगारी, महागाई, शेतमालाला भाव नाही. त्याबाबत पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. परंतु, ४० टक्के निर्यात कर लावला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंर्त्यांनी निर्यात कर रद्द करण्याची मागणी पंतप्रधानांकडे करावी. तुम्हीही गप्प बसलात, तर तुम्हीसुद्धा शेतकरीविरोधी आहात असे समजले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. चव्हाण पुढे म्हणाले, की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्यात आली. जे आमदार त्यांच्यासोबत सत्तेसाठी गेले, त्या आमदारांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला मतदारांनी निवडून दिले आहे.
४ तारखेला ही जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही; तसेच संविधान वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, असेही त्यांनी नमूद केले. पहिल्या तीन टप्प्यांचे विश्लेषण पाहता देशात भाजपला बहुमत मिळणार नाही, कोणत्याच राज्यात भाजपच्या जागा वाढताना दिसत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
निवडणूक रोख्यांची एसआयटीमार्फत चौकशी
निवडणूक रोखे काढून मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरविले आहेत. देशात ‘इंडीया’चे सरकार येताच याप्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.