कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोळसा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी उर्फ लाला याने आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. अनुप माझी याला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र, त्याचवेळी आसनसोल येथील विशेष न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
सीबीआय २१ मे रोजी आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी, चौथ्या टप्प्यातील आसनसोल लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर अवघ्या एका दिवसांत अनुप माझी यानी विशेष न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात अनुपची चौकशी केल्याशिवाय अंतिम आरोपपत्र दाखल कसे होणार, असा प्रश्न सीबीआयने आधीच उपस्थित केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण आहे, परंतु सीबीआय अधिका-यांना त्यांची चौकशी करण्यास प्रतिबंध नाही.
सूत्रांनी सांगितले की, ईडी कोळसा तस्करी प्रकरणाच्या मनी लॉन्ड्रिंग पैलूवरही समांतर तपास करत आहे. या प्रकरणी अनुपला ताब्यात घेण्यास ईडीच्या अधिका-यांना मनाई आहे. आता ईडीचे अधिकारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी पावले उचलतात की नाही हे पाहायचे आहे.कोळसा तस्करी प्रकरणाचा तपास २०२० मध्ये सुरू झाला. कोल इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी, ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या काही अधिका-यांसह आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील काही अजूनही जामिनावर आहेत.