नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया; मूलभूत सुविधा पुरविण्याच्या नागरिकांनी व्यक्त केल्या नूतन नगरसेवकाकडून अपेक्षा
लक्ष्मण पाटील- निलंगा ( प्रतिनिधी ) : निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी याकरिता कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकमत youtube चॅनलच्या वतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या .यावेळी नागरिकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाचा आलेख सांगत त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून विकास काय असतो हे आम्हाला नऊ वर्षांमध्ये पाहायलाच मिळाले नसल्याची खंत व्यक्त करत नूतन नगरसेवकांकडे निदान मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली.
निलंगा पालिकेत सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र सन 2016 साली नगरपालिकेवर जनतेनी मोठ्या अपेक्षने सन 2016 साली भाजपाच्या ताब्यात एक हाती सत्ता दिली. पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ताधाऱ्यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या कार्यकाळात शहरांमध्ये 24 तास पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे महत्वपूर्ण काम केले. याशिवाय प्रत्येक समाजासाठी सभागृह , ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिराच्या ठिकाणी भक्तांसाठी निवास , शहराचे सुशोभीकरण , शादी खाने व एमआयडीसीला जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागा उपलब्ध करणे आदीसह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले.
मात्र पाच वर्षाच्या भाजपाच्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये व चार वर्षाच्या प्रशासक राज्यामध्ये विकास काय असतो हे आम्हाला पाहायलाच मिळाले नसल्याचा सत्ताधाऱ्यावर आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे शहरांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यामध्ये पालिका अपयशी ठरल्याचा खंत व्यक्त करीत शहरात स्वच्छतेचे तीन तेरा उडाल्याचे नागरिकांनी सांगितले. एकीकडे शहराला स्वछ पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत असले तरी ते दूषित व पिवळसर पाणीपुरवठा होत असताना देखील त्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले यामुळे नागरिकांना दूषित पाण्यावरच समाधान मानावे लागले. शहरातील काही प्रभागांमध्ये अजून देखील रस्त्याचा पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न मिटलेला नाही.
मोकाट कुत्र्यासह जनावरावर आवर घालण्यामध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरले. सत्ताधाऱ्याकडून कोणताही ठराव नसताना अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचे तीन ठिकाणी उद्घाटन करून समाजाची दिशाभूल करण्यात आली. शहरातील एमआयडीसी ओसाड पडली असून शहरात साधा एक सुईचाही कारखाना नसल्याचा नागरिकांनी सत्ताधाऱ्यावर घनाघाती आरोप करत निदान जनतेला पालिका प्रशासनाने मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली. तसेच शहरातील सुजाण नागरिकांनी होतकरू चांगल्या विकास कामाची दृष्टी असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच शहराचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी निगराणी करिता माणसाची नियुक्ती करण्यात यावी.
निळकंठेश्वर मंदिर परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल घाण पाणी रस्त्यावर सोडत असल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. म्हणून निवडून येणाऱ्या नूतन नगरसेवकानी व पालिका प्रशासनाने निदान शहरांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशा अपेक्षा व्यक्त करत शहरातील स्वच्छता , तुंबलेली गटार साफ करावे , रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न मिटवावा कारण निवडणुका आल्यानंतर एक दिसाड नळाला पाणी येते मात्र निवडणुका संपल्यानंतर आठवड्यातून एक दिवस नळाला पाणी येते अशी दयनीय अवस्था शहरातील आहे.तसेच निदान शहरातील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर परिसरातील व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घाणीचे साम्राज्य दूर करावे अशी मागणी करत मूलभूत सुविधा पूर्ण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
















