अय्यूब कादरी
धाराशिव : मी ऑपरेशन करतो, ते बिनटाक्याचे करतो… असे लोकप्रिय विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिवच्या दौ-यात केले. स्वत:ला इतके सक्षम समजणारे शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवर उत्तर शोधण्यात अद्याप तरी अयशस्वी ठरले आहेत. काल त्यांच्या दौ-यावेळी शिवसेनेच्या एका गटातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांना स्थानबद्ध केले होते. अशाप्रसंगी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेणे समजू शकते, मात्र उपमुख्यमंर्त्यांचा दौरा आणि त्यांच्याच पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे.. हे दुर्मीळच असावे. हा दुर्मीळ प्रसंग धाराशिवकरांना रविवारी अनुभवता आला.
राजकीय नेते ब-याचवेळा असंबंद्ध बोलून जातात. माध्यमांतून त्याला प्रसिद्धीही मिळते. कार्यकर्त्यांना खूश करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा त्यामागचा हेतू असतो. लोकांचे काय, ते काही दिवसांनी विसरून जातात. रविवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात असेच बोलून गेले. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, बिनटाक्यांचे ऑपरेशन करतो, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडून मोठी मर्दुमकी गाजवली, असे दाखवण्याचा शिंदे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. तसे दाखवणे त्यांची मजबुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही गटबाजी चांगलीच उफाळून आली होती. माजीमंत्री, आमदार तानाजी सावंत आणि माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उमरग्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे ठळकपणे दिसणारे दोन गट. या गटांमध्येही बरेच अंर्तर्विरोध दिसून येतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या गटांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, असे आरोप झाले. गटबाजी नवी नाही, तरीही शिंदे यांना यावर उपाय सापडलेला नाही.
परिस्थिती अशी असताना शिंदे मात्र नेहमीच दर्पोक्ती करत असतात. शिवसेना फोडल्याचा वास या दर्पोक्तीला असतो. शिवसेना का फुटली, चौकशीचा ससेमिरा मागे लागला होता का, आता सध्या शिवसेनेतील एक गट भाजपमध्ये जाणार का, हे आणखी उपप्रश्न आहेत. कदाचित त्यामुळेच शिंदे यांना अशी विधाने करावी लागत असतील.
भाजप सशक्त असल्याचा महायुतीला फायदा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात भाजप सुस्थितीत आहे, सशक्त आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. शिवसेनेतील गटबाजी पाहता कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारांना सहलीवर पाठवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठबळावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणे सहज शक्य असतानाही महायुती अभेद्य ठेवण्यासाठी आमदार पाटील यांनी शिवसेनेला सोबत घेऊन उपाध्यक्षपद दिले.
















