कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर दरम्यान, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिका-यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहून एसआयआर ड्युटीवर तैनात असलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचा-यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत भंग झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि उपमुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुरक्षेतही तडजोड करण्यात आली आहे असेही पत्रात म्हटले आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची आधीच दखल घेतली आहे. मुख्य निवडणूक अधिका-यांची सुरक्षा देणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर सुरक्षा मजबूत केली पाहिजे. एसआयआर प्रक्रिया आणि डेटा संरक्षित करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय देखील केले पाहिजेत. निर्देशानंतर उचललेल्या पावलांची माहिती ४८ तासांच्या आत द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाने केली आहे.
बीएलओंनी केले होते आंदोलन
बीएलओ हक्क संरक्षण समितीच्या शेकडो सदस्यांनी कॉलेज स्क्वेअरपासून सीईओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आणि धरणे आंदोलन केले. पोलिस मानवी अडथळ्याप्रमाणे पहारा देत असतानाही, काहींनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. गर्दीत काही निदर्शकांनी कार्यालयात घुसून धरणे आंदोलन सुरू केले.
एसआयआर प्रक्रियेत अडथळयाचा प्रयत्न
केएमसी नगरसेवक सजल घोष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एक गट घोषणाबाजी करत घटनास्थळी पोहोचला. त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना धमकावून चालू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

