22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात उष्माघाताचे तीन बळी

विदर्भात उष्माघाताचे तीन बळी

मुंबई : राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. तर काही भागात अधूनमधून वादळी वा-यासह पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत असे असले तरी विदर्भात मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भात उष्माघाताने तीन बळी घेतले आहेत. उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा तर बुलढाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर गेला आहे. अशातच नऊ महिन्याच्या चिमुकलीसह एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. बेलोरा येथील विद्या निलेश टेकाम असे मृत चिमुकल्या मुलीचे नाव आहे तर, चिचमंडळ येथील दादाजी मारुती भुते असे ७० वर्षीय मयत वृद्धाचे नाव आहे.

सध्या ४० रुग्णांवर उपचार सुरू
उष्माघातामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मृत्यूचं नेमके कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सांगता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दूरध्वनी वर संपर्क केला असता दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात सध्या ४० उष्मघाताच्या रुग्णांवर उपचार सुरू असून तहसील रुग्णालयात १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ६६ असे एकूण ८४ शीत कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

शेतमजुराचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सचिन वामनराव पेठारे असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या ४० वर्षीय मजुराचे नाव आहे. सचिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून तो शेत मजूर म्हणून काम करत होता. सचिन वामनराव पेठारे याची तामगाव पोलिसांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR