जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणा-या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार माजला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत मदतकार्य हाती घेतले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला.
लेकरांचा मन हेलावणारा आक्रोश
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणा-या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून मृतांचा आकडा आणि ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अपघाताचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांपैकी कुणी रुग्णालयात पोहोचले तर कुणी अपघातस्थळी पोहोचले. तिथले दृश्य पाहून लेकरांनी एकच आक्रोश केला.
















