मुंबई : भारतीय क्रिकेटमधील स्टार युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा लांबण्याची शक्यता आहे. आयर्लंडमधील बेलफास्ट येथे उसळलेल्या हिंसाचारामुळे भारत-आयर्लंड टी २० मालिकेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर परिस्थिती सामान्य झाली नाही, तर सामने दुस-या ठिकाणी हलवण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ आणि २८ जून रोजी बेलफास्टमधील स्टॉर्मोंट क्रिकेट मैदानावर दोन सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. ही मालिका वैभव सूर्यवंशीसाठी ऐतिहासिक ठरू शकते. जर त्याला संधी मिळाली, तर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू बनेल. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर बेलफास्टमधील परिस्थिती बिघडली. स्थानिकांना आपली घरे सोडून पळून जाण्यास भाग पडले आणि अनेक घरे व वाहनांचे नुकसान झाले.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवांवरही परिणाम झाला. या घटनेनंतर, क्रिकेट आयर्लंडने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. क्रिकेट आयर्लंडने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ज्या भागांमध्ये जातीय अशांतता कायम आहे, तेथील परिस्थितीवर आम्ही सतत लक्ष ठेवत आहोत. खेळाडू, प्रशिक्षक, सामना अधिकारी आणि प्रेक्षकांची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे. बोर्डाने असेही म्हटले आहे की ते संबंधित अधिकारी आणि प्रांतीय संघटनांच्या संपर्कात आहेत. लिस्बर्नमधील आंतर-प्रांतीय टी २० महोत्सवही रद्द करण्यात आला आहे.
बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून
बीसीसीआय बेलफास्टमधील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवून आहे. बोर्डाच्या जवळच्या सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की, येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास, सामने दुस-या ठिकाणी हलवण्याचा विचार केला जाऊ शकतो. भारतासाठी हा दौरा केवळ एक द्विपक्षीय मालिका नसून, एका नव्या युगाची सुरुवात आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
















