दांबुला : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील साखळी फेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरललेल्या वैभव सूर्यवंशीने आज सुरू असलेल्या फायनलमध्ये आपल्या फलंदाजीचा रुद्रावतार दाखवला. पहिल्या चेंडूपासून चौकार षटकारांची बरसात करत वैभव सूर्यवंशीने अवघ्या ११ चेंडूत ४५४.५४ च्या भन्नाट स्ट्राईक रेटसह ५० धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. वैभवने ११ चेंडूत ठोकलेले अर्धशतक हे लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. या खेळीदरम्यान वैभवने सर्वात वेगवान अर्धशतकाचा कौशल्या विरारत्नेचा विक्रम मोडीत काढला. त्याने १२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या भारतीय सलामीवीरांनी या संधीचा लाभ घेत श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यात वैभव सूर्यवंशीने तर खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. दरम्यान, श्रीलंका अ संघाकडून सिराझने टाकलेल्या तिस-या षटकात वैभव सूर्यवंशीने तीन षटकार आणि दोन चौकारांसह २८ धावा चोपून काढल्या.
त्यानंतर पुढच्या षटकात आणखी १६ धावा वसूल करत वैभवने अवघ्या ११ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद करताना वैभव सूर्यवंशीने पाच चौकार आणि पाच षटकार ठोकले. उल्लेखनीय बाब म्हणजे या पन्नास धावा वैभवने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच काढल्या. यादरम्यान, त्याने एकही धाव धावून काढली नाही.
















