नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला नवे बळ मिळाले. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या कामकाजासाठी झोहो या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचे अॅप वापरण्याचा निर्णय घेतला. याआधी अनेक मंत्री आणि सरकारी विभाग परकीय प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून होते. झोहोचा स्वीकार करताना वैष्णव यांनी नागरिकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, स्थानिक तंत्रज्ञान वापरा, असे आवाहन केले. झोहो ही चेन्नईस्थित कंपनी असून दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ई-मेल यांसारख्या सेवा पुरवते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ते आता दस्तऐवज, स्प्रेडशीट्स आणि सादरीकरणांसाठी झोहोचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणार असून, हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी स्वीकारण्याच्या आवाहनाच्या दृष्टीने एक ठोस पाऊल आहे.
अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना उत्सवी काळात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते.
त्याचबरोबर कर प्रणालीतील सुधारणा, जीएसटी दरकपात आणि जीएसटी बचत महोत्सव यांसारख्या उपक्रमांद्वारे लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पार्श्वभूमीवर आयटी मंत्र्यांचा हा निर्णय धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. यामुळे परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होईल, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा सुधारेल.
मोदींचा स्वदेशी मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांपासून वारंवार स्वदेशी उत्पादन आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा मंत्र दिला. याचा उद्देश विदेशी अवलंबित्व कमी करणे, स्थानिक उद्योग, सॉफ्टवेअर कंपन्या, छोटे व मध्यम उद्योग यांना बळ मिळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
















