मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस ंिनदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे. जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडल्याने जिल्हाधिका-यांची तत्काळ बदली करावी. जिल्हा पोलिस प्रमुखांना तत्काळ निलंबित करावे. नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी आणि हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत. विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलिसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुलेआम व्हीडीओवरून धमकी देतो. पण त्याला सरकार का पकडत नाही. अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडविला असता तर दुर्देवी घटना घडली नसती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, असा आरोप वडेट्टीवार यांनी लगावला. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.