धाराशिव : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी मतदान होत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात सरळ सामना रंगला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून निकालातून मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण २९ तालुक्यांमध्ये २९ मतदान केंद्रांची व्यवस्था निवडणूक विभागाने केली आहे. मतदान सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असून प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे निवडणूक रिंगणातील दोन्ही प्रमुख उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील असून उमरगा तालुक्याचे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांनाही या निवडणुकीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदारसंख्या काहीशी घटली आहे. मागील निवडणुकीत एकूण १,००५ मतदार होते. मात्र यंदा १७ मतदारांची घट होऊन मतदारसंख्या ९८८ वर आली आहे. त्यामुळे प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदारसंख्येच्या दृष्टीने लातूर जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये एकूण ३६७ मतदार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये ३१७ मतदार आहेत, तर बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया रखडल्याने अनेक ठिकाणी सदस्य अस्तित्वात नसल्याचा परिणाम मतदारसंख्येवर झाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या मतदारसंघातील निवडणूक ही केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून निकालातून मराठवाड्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज बांधला जाणार आहे.
आता मतदान प्रक्रियेनंतर २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यापैकी कोण विजयाची बाजी मारणार, याची उत्सुकता तीनही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
















