बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे समितीने मान्य केले आहे. यावर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे आणि पुढे ही तेच वाटत राहील त्यात बदल होणार नाही असे मुंडे म्हणाल्या.
मराठा समाजासाठी जीआर काढला तर ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समितीही काढली आहे असें पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्य सरकारकडून यावर सुवर्णमध्य काढला जाईल ही प्रार्थना केली आहे. सगळे समाज आनंदात नांदावे ही इच्छा व्यक्त केल्याचे मुंडे म्हणाल्या. सामाजिक मागासलेपण असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल असा विश्वास आहे. जीआरमुळे ओबीसी वर अन्याय होणार असे वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे. आम्ही तपासून पाहू असेही पंकडा मुंडे म्हणाल्या. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आमचा ओबीसींना असल्याचेही मुंडे म्हणाल्या. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी पावले उचलली जात आहेत.
हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर त्याचा फायदा हा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण या आधीच ५८ लाख नोंदी सापडल्या असून त्या आधारे अनेकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे. तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या ही जरांगेंची मागणी जरी सरकारने मान्य केली नसली तरी ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नात्यातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे.