मुंबई : धुरंधर चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अक्षय खन्नाबाबतफराह खानने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये एक रंजक किस्सा सांगितला. ९० च्या दशकात अक्षयसोबत काम करणे आपल्यासाठी मानसिक त्रासाचे होते, असे फराहने म्हटले आहे. त्यावेळी अक्षय सेटवर अत्यंत चिडचिडा असायचा आणि त्याचा स्वभाव खूप वेगळा होता, ज्यामुळे फराह त्याच्यासोबत काम करण्यास टाळाटाळ करायची.
मुलाखतीत फराह खान म्हणाली ९० च्या दशकात मी अक्षय खन्नासोबत दोन तीन सिनेमांमध्ये काम केले आणि मला अक्षरश: मानसिक त्रास झाला. कारण तो वेगळाच माणूस होता. खूप इंट्रोवर्ट होता, सेटवर अजिबातच चांगला वागायचा नाही. जेव्हाही मला कळायचे की सिनेमात अक्षय खन्ना आहे तेव्हा मी तारखा नाहीत सांगून सिनेमा रिजेक्ट करायचे. मला वाटते तेव्हा तो म्हणालेला की त्याचे केस गळत आहेत.
त्यामुळे तो नेहमी चिडचिड करायचा. अनेकदा वस्तू रागाने फेकायचा आणि म्हणायचा, ‘हा कसा डायलॉग आहे?. त्याचा स्वभाव तेव्हा असाच होता. ती पुढे म्हणाली, पण दिल चाहता है सिनेमानंतर माझे अक्षय खन्नाबद्दल मत बदलले. तो फरहान अख्तरचा पहिला सिनेमा होता म्हणून मी तो स्वीकारला होता. तेव्हा अक्षयच्या स्वभावात बराच बदल झाला होता. त्याने आपली केस गळती स्वीकारली होती आणि तो रिलॅक्स झाला होता. सिनेमावेळी तो एकदम चिल मोड मध्ये असायचा. याआधी जर कोणत्या सीनमध्ये पाणी किंवा पाऊस असेल तर तो टोपी घालायचा. त्याने ‘ताल’ सिनेमातल्या गाण्यात पावसाच्या सीनमध्ये टोपीच घातलेली दिसते. पण दिल चाहता है नंतर सगळे बदलले.
आमिर आणि सैफपेक्षाही सरस डान्सर
अक्षयच्या स्वभावाबद्दल बोलताना फराहने त्याच्या डान्सिंग कौशल्याचेही भरभरून कौतुक केले. अक्षय एक उत्तम डान्सर असल्याचे सांगताना ती म्हणाली की, कोई कहे कहता रहे या गाण्यात अक्षयने आमिर खान आणि सैफ अली खान यांच्यापेक्षाही सरस डान्स केला आहे. आता अक्षय पूर्णपणे बदलला असून तो एक उत्तम व्यक्ती आणि कलाकार असल्याचे फराहने स्पष्ट केले.

