मुंबई : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक, त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्षे विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात यंदा स्वखर्चाने सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील ‘विठुराया’ ची सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या काळात ५, ६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.